मला माफ कर – २

चित्रसौजन्य: whatislove-2010.blogspot.com

चित्रसौजन्य: whatislove-2010.blogspot.com

धर्मांतरानंतर त्याला हिंदू मुलीशी कसं लग्न करता येणार होतं? सुधीरचं मन ते मान्य करायला तयार  होत नव्हतं. फार विचारांती त्यानी इतकं मोठं पाऊल उचललं होतं. आपण ज्या धर्मात जन्माला आलो तो धर्म सोडणे म्हणजे पुन्हा नव्याने जन्म घेण्यासारखच आहे. बाबा गेल्याचं असीम दुःख, नातेवाईकांकडून दुर्लक्षितता, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शनाचा अभाव आणि इतर बऱ्याच गोष्टींनी सुधीरला त्या ३३ कोटी देवांपासून तोंड फिरवण्यास भाग पाडलं होतं. पुण्याला जाईल तेव्हा प्रत्येक वेळी त्या दगडूशेठ समोर हात जोडून जोडून तो थकला होता. सुधीर स्वच्छंदी आणि आत्ममग्न राहण्यास शिकला होता. इतक्या उच्चशिक्षणानंतर त्याला नोकरीसाठी बरीच वणवण करावी लागली होती. पण आता सगळं ठीक होतं. मुंबईत नोकरी, चांगला पगार आणि मनाजोगी लाइफस्टाइल. सगळेच हवे तसे.

एका समधर्मीय मित्राकडून सुधीरसाठी एका मुलीचे स्थळ आले होते. इतके दिवस “मला मुलगी कोण देणार?” अशा विचारात असणाऱ्या सुधीरला ‘धीर’ मिळाला. मागाहून आई आणि घरची मंडळी काय म्हणतील याचा मुळी विचारच सुधीरने केला नव्हता. परस्पर एकटा जाऊन मुलगी पाहून आला. तो एक छोटेखानी साखरपुडाच होता. दोन्हीकडून पसंती सुद्धा झाली. लग्न ठरले शेवटी! सुधीरच्या घरच्या मंडळींना हे सगळं समजून घेणं खूप अवघड होतं. प्रथमदर्शनी विरोध दर्शवला नसला तरी सगळ्यांचा ह्या प्रकाराला प्राणांतिक विरोध होता.

सुधीरची सुट्टी संपताच तो मुंबईला परत गेला. त्याला जरी वरवर सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असलं तरी तसं ते मुळीच नव्हतं. मागाहून इथे घरी सुधीरसाठी आई कडून एक स्पष्ट संदेश आला, “तुला हे लग्न करायचं आहे. खुशाल कर. पण मग पुन्हा इथे पुण्यातल्या घरात अजिबात पाऊल ठेऊ नको. तुझी आई तुझ्यासाठी मेली”. सुधीरचा ह्या लग्नाविषयी इतका निर्धार झाला होता की तो मागे वळून पाहायला मुळी तयारंच नव्हता. सुधीर आता मोठा झाला होता. आर्थिकरित्या स्वतंत्र होता. घरातल्या ह्या प्रचंड विरोधाला सामोरं जाण्याचं धाडस त्याच्यात निश्चितंच होतं.

सुधीर “ती”चा चेहरा आठवून आनंदून जात होता. तिला मराठी वगेरे मुळीच येत नव्हतं. एकदा भेट झाली तेव्हा तिच्या तोंडून हिंदीचे दोन चार शब्द कानावर पडले तेवढंच काय ते. मूळ धर्मात न जन्मलेल्या सुधीरसोबत आपलं अवघं आयुष्य काढायला ती तयार झाली होती. सुधीर तिचा एकदाच कटाक्ष टाकून पाहिलेला चेहरा आठवून स्वतःच लाजून जायचा. भविष्यातील एकत्र दृश्यांच्या स्वप्नात तो रंगून जायचा. तो आता फक्त पुढचा विचार करत होता. आई ला स्पष्ट “नाही” देखील म्हणून सुधीर मोकळा झाला. “ती”ची आठवण आली तरी “त्यांच्या” संस्कृतीत लग्नाआधी मुलीशी बोलणे म्हणजे घोर पाप. फोन करून “ती”च्या तोंडून एखाद-दोन शब्द ऐकण्याची देखील सोय नव्हती. पण सुधीर मात्र मनोमनी “ती”ने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला मान देत आपला भूतकाळ त्याग करायला तयार झाला होता. प्रथमदर्शनी प्रेम म्हणजे फक्त बाह्यांगाची आपल्या डोळ्यांवर पडलेली भोवळ असते. पण सुधीरच्या बाबतीत हे निखळ प्रेम होतं. “ती” सुद्धा माझ्याविषयी असाच विचार करत असेल का? माझ्या स्वप्नांत रंगली असेल का? असेल सुद्धा. पण सुधीरला ते कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. पण “ती”च्यावर त्याचा खूप अगाध विश्वास होता. आपण ज्या घरी २५ वर्ष राहिलो, वाढलो, शिकलो, त्याला मागे टाकून, घरच्यांशी इतका मोठा द्रोह करून तो “ती”च्या निखळ प्रेमात पडला होता.

काही दिवसांनी मात्र सुधीर खूप अस्वस्थ झाला. इतके दिवस तो आईशी बोलण्यावाचून कधी राहिलाच नव्हता. पण जेव्हा जेव्हा असे विचार त्याच्या मनात येई, तेव्हा तो लगेचंच “ती”चे ते टपोरे डोळे आठवायचा, तिचे ते घाबरे बोल आठवायचा. आणि मग त्यात विरून जायचा. मग पुन्हा ऑफिसातून संध्याकाळी घरी आला की नेहमीप्रमाणे आईचा नंबर त्याच्याकडून अनाहूतपणे फिरवला जायचा. पण एक दोन रिंग झाले की त्याच्या लक्षात येई की तो आता आपला मार्ग नाही. मग तो फोन अगदी न दिसेल अशा जागी ठेवून देई. पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तस-तसं सुधीर खूपच अस्थिर झाला. सैरभैर वागू लागला. एकीकडे भूतकाळ आणि दुसरीकडे भविष्यातला दिसणारा “ती”चा मृगजळ.  त्याच्या आणि “ती”च्या मिलनात काही महिन्यांचा कालावधी उरला होता.

पण आता मात्र हद्द झाली. असंवेदनशीलतेची, आईशी कृतघ्न होण्याची. सुधीरला आईचा अबोला आतून कापत होता, अस्वस्थ करीत होता. त्याने “ती”च्या वडिलांना फोन करून लग्नासाठी नकार दिला. संपलं सगळं. आजवर इतक्या लोकांच्या आत्म्याचा अंत पाहिला, पण आज शेवटी सुधीरला हे पाऊल उचलावं लागलं. आपल्या आईसाठी, तिने आपल्यासाठी केलेल्या संघर्षासाठी. सुधीरच्या अंतर्मनात चाललेल्या या द्वंद्वाचा आज अंत झाला.

पण सुधीरने स्वीकारलेल्या धर्मातल्या “खुदा”ला हे मुळीच मंजूर नव्हतं. त्याचातर स्पष्ट हुकुम होता – लग्न करायचं असेल तर फक्त समजातीय मुलीशीच. म्हणून सुधीरचा हा सारा अट्टाहास. पण स्वर्गात लिहिलेल्या कायद्यांना ह्या नतद्रष्ट दुनियेत अमलात आणणं खुपंच कठीण असतं. सुधीर फक्त सरळमार्गी धर्मपालन करत होता. पण धर्म ही बाब फक्त वैयक्तिक राहू शकत नाही का? तिला स्वतःपुरता राहू देणं शक्य आहे का? अशाच काही विचारांचे काहूर सुधीरच्या मनात माजले होते. पण तो हतबल होता. त्याचं हृदय ही मांस आणि पेशींनी बनलं होतं, दगडानी नव्हे. त्याने माघार घेतली. मन मारून.

आज तो आपल्या आधीच्या आयुष्यात रमला आहे. चेहऱ्यावरून आनंदी दिसतो. पूर्वी दुभंगलेली नाती पुन्हा जोडली गेली आहेत. मधल्या काळातल्या “ती”च्या आठवणींनी भरलेला त्याच्या हृदयातला कोपरा दुर्लक्षित झाला आहे. ह्या सगळ्यात बिचाऱ्या “ती”चा काय दोष? आपलं अखंड आयुष्य “ती”ने सुधीरला देऊन टाकलं होतं.

आजही अधून मधून त्या हृदयातल्या कोपऱ्यातून “ती”च्या आठवणी अलगद बाहेर येऊन सुधीरच्या डोळ्यांसमोर उभे ठाकतात. पण सुधीर मात्र त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करतो. पाहून न पाहिल्यासारखं करतो. कारण त्याच्याकडे त्या आठवणींच्या रुपात उभ्या असलेल्या प्रश्नचिन्हाला ‘मला माफ कर’ असं म्हणण्याशिवाय देण्यासाठी काहीच उत्तर नसतं.

(एक महत्वाची नोंद: वैयक्तिक अनुभवांतून येणारं लेखन करणं तसं काहीसं सोपं आहे. पण आपल्या आणि इतरांच्या अनुभवांची सांगड घालून एक रूपक आणि प्रतीकात्मक लेखन करणं थोडसं अवघड. त्यातलाच हा लेख म्हणजे माझा त्या दृष्टीने पहिला प्रयत्न. हा लेख प्रकाशित करताना आज “मातृदिन” आहे हा योगायोग म्हणावा की आणखी काही? प्रेम आणि मातृप्रेम यांच्या द्वंद्वयुद्धात अडकलेल्या सुधीरनी मातृप्रेमाचा पुरस्कार करून ‘आई’ला सर्वश्रेष्ठ मानलं. पण सुधीरच्या त्या प्रेमळ हृदयाचा कानोसा घेणं ही तितकंसं जरुरीचं आहे. सुधीरचा निर्णय बरोबर की चूक ह्याऐवजी त्याच्या ह्या निर्णयाचा परिस्थितीनुरूप विनिमय करून त्या दृष्टीकोनातून विचार केला की हे कोडे उलगडणे आपल्याला सहजशक्य होईल. मी आजवर पुष्कळ मुलींकडून त्यांना मुलांनी सोडल्याचे आणि फसवल्याचे (?) बरेच किस्से ऐकले आहेत. सुखकर आयुष्य आणि घरच्या इस्टेटीखातर त्यानी मला सोडलं, असा ह्या मुलींचा आरोप असतो. पैसा, घर ह्या पलीकडेही त्या मुलाला एक आई असते, तिचे सर्वार्थ त्या मुलात असते, तो मुलगा म्हणजे त्या आईचा आत्मा असतो; हे सगळं ह्या मुली अगदी सहज विसरतात. त्या सांगून न समजणाऱ्या मातृप्रेमाला दुर्लक्ष करणं म्हणजे त्या मुलांनी जवळ जवळ आत्महत्या केल्यासारखंच आहे.
अशा पद्धतीचा लेख लिहिण्याची उर्मी माझ्यात निर्माण केल्याबद्दल नीलिमा काकू तुझे खरंच खूप आभार. इतके दिवस अर्धवट टांगणीला लागलेले सुधीरचे भविष्य आज निश्चित झाले. हा प्रतीकात्मक सुधीर मात्र नक्कीच माझे आभार मानत असणार! पुनःश्च धन्यवाद)  

मयूर रे. इंडी

१२ मे, २०१३ रविवार 

मस्क़त, ओमान.

रत्ना

स्थलांतर करणं म्हणजे इतके दिवस जे समजत होते ते इतकं साधंसोपं नव्हतं. फक्त महाराष्ट्रापुरतीच माझी भ्रमंती सीमित होती. पण बंगळुरूला गेल्यावर कळालं, आपला प्रांत सोडून परक्या ठिकाणी किती अडचणी येतात ते. कर्नाटक राज्याच्या या राजधानीत त्यांच्या मातृभाषेत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मला तर कन्नड अजिबातच येत नव्हतं. सगळ्यात मोठा प्रश्न होता कामवाल्या बाईचा. कारण त्या लोकांना तर कन्नडशिवाय दुसरी भाषा येत नाही. माझ्याकडे काम करायला रत्ना यायला लागली. पहिल्यांदा हातवाऱ्यांनी केले जाणारे संभाषण हळूहळू शब्द त्यांची जागा घेऊ लागले होते. पुन्हा पुन्हा येणारे शब्द आणि संदर्भावरून मी अर्थ लावत होते. तिच्या-माझ्यात एक वेगळाच संवाद निर्माण झाला होता.

रत्ना काळीसावळी नीटस होती. अंगकाठी चवळीच्या शेंगेसारखी लवलवती होती. डोळे भेदरलेल्या कोकरासारखे. महिना- दीड महिना मी या समजुतीत होते की, तिचे लग्न व्हायचे असावे. पण एक दिवस दोन वर्षांच्या एका मुलाला कडेवर घेऊन ती आली, तेव्हा तिच्या संसाराची कथा कळली. आणि त्या कथेतली व्यथाही. सहा वर्र्षांत तीन मुलं झालेली रत्ना ‘नशीब अजमावण्यासाठी’ बंगळुरूला आली होती. बंगळुरूमध्ये तीही नवखी होती. मीही नवखी होते. पण तिचं नवखेपण म्हणजे एका छोटय़ा गावामधून बंगळुरूसारख्या महानगरीत आल्याचं बावरलेपण होतं. नव्या जगात प्रवेश करताना येणारं भिरभिरलेपण चेहऱ्यावर दिसत होतं. वयाच्या पंधराव्या वर्षी तिचं लग्न झालं. नवरा शेती करत होता, लग्न झाल्यावरसुद्धा भांगलणी, खुरपणी करायला शेतावर जाई. पण तिच्या लग्नानंतर दोन-तीन वर्षांनीच नवऱ्याच्या सावत्र भावाने सगळी शेती हडप केली आणि रत्ना, तिची सासू आणि नवरा यांना घराबाहेर काढलं. दोन पोरं, नवरा आणि सासू यांना घेऊन रत्ना बंगळुरूला आली. तिचा काका पोलिसात होता. तो नवऱ्याला काही काम देईल या आशेने ती आली खरी, पण घरी बसायची चटक लागलेला तिचा नवरा काही ना काही कारणं काढून घरीच बसायला लागला. पर्यायाने, रत्नाच्या नशिबी धुणीभांडी करणं आलं.

रत्नाचे भोग इथेच संपत नव्हते. नवऱ्याला जुगाराचे व्यसन लागले. राबून, कष्ट करून हाता-तोंडाची गाठ घालताना रत्नाची दमछाक व्हायची. तीन पोरं पदरात, सासूची दादागिरी, नवऱ्याची व्यसनाधीनता, खरंतर कंटाळून जायला हवं होतं रत्नानं. पण त्रासला होता तिचा नवरा. सारखा तिला धमकी द्यायचा मी जीव देतो म्हणून, एक दिवस कंटाळून रत्नानं त्याला निक्षून सांगितले, ‘जा जाऊन जीव दे, नुसता खायला काळ आणि भुईला भार, तू गेलास की मी सुटीन एकदाची.’ मध्येच एकदा दोन-तीन दिवस रत्नाचा पत्ताच नव्हता. तिसऱ्या दिवशी आली. डोळे सुजलेले, चेहरा ओढलेला. विचारायला गेले तर धो-धो रडायला लागली. तिच्या नवऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांची झंझट मागे लागली. काका पोलीस असल्याने निभावून गेलं.  असाच प्रयत्न पुन्हा दोन वेळा झाला. आता ती आयुष्याला कंटाळल्यासारखी झाली होती. रहाटगाडगं चालूच होतं. अचानक दोन-तीन दिवस रत्ना आलीच नाही.

एक दिवस, सकाळीच दारावरची बेल वाजली. समोर उभी होती अस्ताव्यस्त केस पिंजारलेली, चेहऱ्यावरची रया गेलेली, डोळे खोल गेलेली रत्ना. तीन दिवस ती कामाला नव्हती. तीन दिवसांत रत्नामध्ये इतका फरक! आज पुन्हा नवऱ्याशी वाजलं वाटतं. असं काहीबाही मनात येत असतानाच रत्नाचा घोगरट स्वर माझी तंद्री भंग करून गेला. तिचा चिरका आवाज आणखीनच बसला होता. ‘दुड्ड बेकम्मा. केलसक्के आमेले बरतीनी.’ म्हणजे हिला पैसे पाहिजे होते.  मी काही म्हणायच्या अगोदरच ती मला म्हणाली, बघताय नव्हे कपाळावरचं कुंकू गेलं माझ्या. अंगावर एकदम सर्रकन काटाच आला. काखोटीला झोपलेलं पोर, साडी कशीतरी खोचलेली. ब्लाऊज गळ्याची हाडं दाखवत खाली ओघळलेला. डोळे मात्र कोरडेठाक. दारातच जमिनीवर फतकल मारून रत्ना बसली. घरात यायला तयार नव्हती. डोळे जमिनीकडे लावून कसलीतरी वाट बघत असल्यासारखी बराच वेळ गप्प होती. मलाही काय बोलावं सुचत नव्हतं. रत्नानं तिची कहाणी सांगायला सुरुवात केली.

त्या दिवशी सकाळी सगळी कामं आवरून रत्ना घरी गेली. पोरांना जेवायला घातलं. स्वत: जेवली आणि नवऱ्याची वाट बघत बसली. नवरा आला तोच दारू पिऊन. दारू पिऊन आला की तो निपचित पडत असे. भांडणतंटा, शिव्या यापासून दूर. पण निराशेच्या गर्तेत खोल जायचा. त्या दिवशीही तसाच. त्यामुळे कोणताही किंतु रत्नाच्या मनात आला नाही. पाणी भरून तिनं चहा केला. स्वयंपाकाला लागणार इतक्यात चिकम्मा, तिची आत्या, काही काम आहे म्हणून बोलवायला आली. रत्ना हातातलं काम टाकून, धाकटय़ाला तसंच टाकून नवऱ्याला सांगून निघाली. लोळत पडलेला तिचा नवरा, डोळे टक्क उघडे होते. पण उठायला तयार नव्हता. रागारागातच, नवऱ्याला उठण्याविषयी सांगून ती बाहेर पडली. जेमतेम वीस-पंचवीस मिनिटांसाठी बाहेर गेलेली रत्ना. येऊन बघते तर दार आतून बंद. हाका मारल्या. आतून प्रतिसाद नाही. म्हणून दारावर धडका मारल्या. हूं का चूं नाही. चिकम्माला पुन्हा बोलावले. चिकम्मा, तिचा नवरा, सगळे आजुबाजूचे लोक धावून आले. पण.. दार मोडून आत शिरल्यावर पाहते तो काय! तुळईला रत्नाच्याच साडीचा दोर करून त्याने गळफास लावून घेतला होता..
* * *
तीन वर्षांनी पुन्हा बंगळुरूला जायचा योग आला. मैत्रिणीकडे रत्ना अचानकच भेटली. केसात फुलांचा गजरा. अंगाने थोडीशी भरलेली. चेहऱ्यावर टवटवी. रत्नाचं हे पालटलेलं रूप बघून आश्चर्य वाटलं. मोठं ठसठशीत कुंकू. रत्नाचं पुन्हा लग्न झालं होतं. तीन मुलांसकट तिला पत्करणारा या जगात आहे हे बघून सुखद आश्चर्य वाटलं. रत्नापेक्षा वयानं जास्त असलेला व्यंकप्पा, त्याची बायको गेली तरी लग्न करायला तयार नव्हता. गवंडी कामावर रोजंदारीवर होता. पण त्याला रत्नाची कणव आली. सहृदय, पुरोगामी व्यंकप्पाने रत्नाचा स्वीकार केला. दोघंही आपल्या तीन मुलांसह गुण्यागोविंदानं नांदताहेत. रत्नाही चार घरची धुणीभांडी करते. पण आता तिच्या कष्टांना समाधानाची झालर आहे. मुलांना शाळेतही घातलंय. उण्यापुऱ्या दहा वर्षांत रत्नाच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली. दु:खात सुख एवढंच की एवढय़ा मोठय़ा महापुरानंतर आता तिची जीवननौका मात्र संथ पाण्यातनं प्रवास करतेय.

-सविता नाबर

प्रसिद्धी- चतुरंग, लोकसत्ता.

शनिवार , २८ एप्रिल २०१२

ती आई होती म्हणुनी…

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

 
हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता
 

कवी: ग्रेस

कवी ग्रेस यांच्या कवितेतून व्यक्त झालेली ‘आई’  अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात.

तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली, असे ते मानतात…
And when my voice is silent in death,
my song will speak in your living heart
– Ravindranath Tagore
कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर रवींद्रनाथांचे हे उद्धृत अधिकच खरे ठरते. मृत्यूमुळे त्यांचा स्वर शांत झाला असला, तरी त्यांच्या कवितांची गूढ आशयांची स्वरावली रसिकमनात स्पंदत राहिली आहे, राहणार आहे.

शब्दांच्या आशयाच्या, प्रतिमांच्या धुक्यासारख्या रचना करणाऱ्या या कवीच्या प्रतिभेचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण तो पूर्णत्वाला गेला असा दावा कोणीच करू शकलेले नाही. तरीही पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेच्या आशयाचा, रचनालयीचा, प्रतिमांचा उलगडा करून पाहावा असे मात्र सतत वाटत राहते. त्यांच्या कवितेची ही सारी अंगे, तिचे तरल पदर संपूर्णपणे न्याहाळणेही अवघड वाटावे. म्हणून येथे फक्त त्यांच्या कवितेतील ‘आई’ प्रतिमेच्या अर्थनिर्णयाचा प्रयत्न करून पाहायचे आहे.
ग्रेस यांच्या कविता, ललितलेखन यांचे वाचन केल्यानंतर काही गोष्टी ध्यानी येतात. त्यांच्या कलासृष्टीत त्यांचे स्वत:चे खास असे अनुभवविश्व साकार होत गेलेले आहे. कलावंताचे व्यक्तिमत्त्व, त्याचा प्रतिभाधर्म आणि त्याची अनुभव घेण्याची पद्धती यानुसार त्याच्या कलासृष्टीतील अनुभवविश्वाचे स्वरूप, शैली, प्रकृती व रचना हळूहळू निश्चित होत असतात. ग्रेस यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी एकच विषय आहे, असे दिसते. त्यांची प्रतिभा एकाच आशयाभोवती रुंजी घालते आणि त्या दृष्टीने पाहता, ग्रेस यांच्या कलासृष्टीचे अनुभवविश्व एककेंद्री आहे. मानवी जीवनातील अगम्य, अटळ असे दु:ख हे त्यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि हेच दु:ख त्यांच्या साहित्यसृष्टीचे शक्तिकेंद्र आहे. या शक्तिकेंद्रातून असंख्य अनुभवतरंग कलारूपे घेऊन अवतरत राहतात. कवितेत सृजन आणि मरण या दोन टोकांमधले जीवन कवीच्या प्रकृतीनुसार अभिव्यक्त होते. ग्रेस यांच्या कवितेच्या दु:खकळेची सूक्ष्मासूक्ष्म जन्मकारणे त्यांच्या कवितेतून स्पंदत असतात. सृजनशक्तीचे आणि मृत्युशक्तीचे एक केंद्र ‘स्त्री’ आहे. निर्मितीच्या क्षणीच निर्मितीनाशाच्या भयाने कंपित होणारी ग्रेसची जाणीव स्त्रीच्या अनेक प्रतिमांतून सतेज होत जाते. बाला, कुमारी, माता (मातास्वरूप इतर स्त्रिया- त्यांच्या प्रतिमा), या स्त्रीरूपांतून ही जाणीव रूपे धारण करते. सौंदर्य, मार्दव, कामभावना, करुणा, मनस्वीपणा, देहस्वीपणा या गुणांनी त्यांची ‘स्त्री’ नटलेली आहे.

परंतु त्या सर्व रूपांतही ‘आई’ व तिची गुणस्वरूपे तिच्या रूपाने वाटय़ाला आलेले जीवनाचे दु:खमय, करुणामय भागधेय हे ग्रेसच्या या प्रतिमेचे वैशिष्टय़ आहे. या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ही ‘आई’ अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात. तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली. त्यात दु:खाचा, उदासीचा रंग अधिक ठळक आहे असे ते मानतात.
मातृवनात जगत असताना तिच्याही जगण्याच्या सावल्या आपल्या आयुष्यात सरमिसळ झाल्या आहेत, अशी भावना त्यांची कविता व्यक्त करते. आयुष्याच्या सांध्यपर्वात, शब्द हरवून गेल्यावर ती ‘सांजफुलांची वेळ’ होते, पाण्यावरच्या चंद्रखुणा (शृंगारसूचक)ची ती ‘निळीसावळी वेल’ होते, गात्रांचे शिल्प स्पर्शापासून सुटल्यावर ती ‘गतजन्मीची भूल’ होता होता अखेरीस पायात धुळीचे (पार्थिवतेचे) लोळ घेऊन ‘भातुकलीचा खेळ’च होऊन जाते.

‘आई’च्या या देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली, हे आपले प्रारब्ध मानून कवी तिला परोपरीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
‘गावातल्या आठवणी’ या कवितेतून आपल्या वृत्तीतल्या वैरागीपणाचे रहस्य जणू आईच्या वर्तनातून उमटत जाते असेही कवी सुचवितो. शिवाय, मी तुझ्यापोटी आलो म्हणून तू आई होऊ शकलीस. पण मुलगा म्हणून संशयधुक्याच्या वेदनेपेक्षा नि:संग विरक्तीच का दिली नाहीस असाही प्रश्न कवी विचारतो. या वृत्तीतूनच ग्रेसच्या कवितेतील प्रतिमा, आशय यांचे अपारंपरिक रूप दिसून येते.
‘आडवाच झोपलो असतो
मीही गर्भाशयात तर
येऊ दिले असते का
तुझ्या वाटय़ाला माऊलीचे भाग्यपण?’
तेव्हाच शिवून दिली असतीस
भगव्या क्षितिजाची झोळी
तर काय झाले असते?

आईचे चोरून देवळात जाणे- तिथे कुणा संन्याशाचे असणे, याचा एक दीर्घकालीन परिणाम ‘चंद्राच्या राखे’च्या प्रतिमेतून सुचविला जातो. कवीच्या कवितेतून सतत ही संन्यस्त, बैरागी वृत्ती वावरत राहते.
‘आई’च्या देहस्विनी असण्याला कवी याच संन्यस्त वृत्तीने, आयुष्य खूप कळून आल्यानंतरच्या शहाणपणाने स्वीकारतो. आणि या ‘स्त्री’ केंद्रातूनच कवीच्या अनुभवाची कलारूपे साकारतात. ‘माझी आई : सुमित्रा’ या कवितेत कवी लिहितो,

‘परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून
ती केव्हाच निघाली बेभान :
प्रियकरांचे, यारांचे निर्घृण वध, तर डोळी त्यांचेच
धगधगते बेमुर्वत इमान!
संध्या मलुल, पांगळी, अस्तसूर्याच्या भाराने वाकलेली :
तुटलेली कर्णव्याकूळ करंगुळी..
देवासारखे हसता येईल मला : मला संतासारखे रडता
येईल? तिच्या कपाळी, चंद्रमौळी..’
‘आई’ हे ग्रेसच्या कवितेचे एक प्रबळ शक्तिकेंद्र आहे. कवी तिच्याकडे तिच्यातील ‘मादी’पणाकडे पाहतो. तिचे प्रमत्तपणच आपल्याला भुलवते, जगवते, प्रेरणा देते. कवी म्हणतो,

‘माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल..
माझी आई भिरभिर संध्या
घेई सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा..

आईमुळेच निर्मितीशीलतेचा अर्थ कळतो. आईमुळेच ‘शिंदळ वारा’सुद्धा शालीन होतो. अशा आईच्या जाण्यानंतर कवी ‘घनव्याकूळ’ रडतो. तिच्या जाण्याबरोबर आपले बालपणही संपले. जीवनगीताच्या ओळी तुटक, अधुऱ्याच राहिल्या ही जाणीव ठसठसत राहते.

‘‘आता लिहिताना काही
जरा वेगळे वाटते
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेष हळूच ओढावी-
टिंब ठेवूनही अंती
गीत अपुरे वाटते..’’

ग्रेसच्या या ‘आई’ प्रतिमांचा अर्थनिर्णय करताना प्रश्न पडतो की कवितेत कवी आपल्या अनुभूतींचा मागोवा कसा घेत असतो? प्रथम प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेऊन नंतर त्या स्थूल अनुभवाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूती कवितेत व्यक्त करतो का? कविता म्हणजे कवीने/ माणसाने भूतकाळात घेतलेल्या अनुभवाची प्रतिकृती किंवा स्मृतिकोषात तरळणारी प्रतिमा नसते. Poetic image is not an echo of the past! कवीची कल्पनाशक्तीच आपल्या प्रतिमा व्यापाराला वास्तव व भूत यापासून अलग राखत असते.

ग्रेसच्या कवितेतील ‘कवी/मी’ त्याच्या खास अनुभवमुशीतून ‘आई’च्या स्त्री-मादी-देहस्विनीरूपाची अनुभूती घेतो. ही अनुभूती तो स्वत:च्या शब्दतंद्रेतून, कल्पकतेने घेतो. म्हणून त्या अनुभूतीला नवेच कल्पकतापूर्ण अर्थरूप मिळू लागते. तेथे वास्तव ‘आई’ उरत नाही. तिच्या स्वभाव, वृत्ती, देहाचे हुबेहूब शब्दचित्र रेखाटणे यात काव्यात्मता नसते. कवीची भाषा वास्तवाला नवे अनुभूतीस्वरूप, आशयरूप देत असते. यालाच ग्रेस रूपकांची पांघरणी आणि पाझरणी म्हणतात. ग्रेसच्या कवितेत आणि एकूणच त्यांच्या भावविश्वात ‘आई’ किंवा ‘मातृवत’ हा अनुभवविषय असून अनुभव घेणारी कवीची संवेदनशीलता तिचा सर्जनशील कल्पकतेने अनुभव घेते.

‘आई’च्या देहस्विनी स्वरूपातील ‘मादी’ मागे एक कोसळणारे घर सावरणारी, मुलांना जोजवणारी, पाजणारी, पोसणारी ‘आई’सुद्धा आहे. ‘आई’च्या या थकल्या-भागल्या जीवाबद्दलची करुणा ग्रेसच्या कवितेत पुन्हा पुन्हा येत राहते.

‘घर थकलेले संन्यासी
हळुहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमध्ये
नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या-मधुरा,
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते.
पक्ष्यांची घरटी होती
ते झाड तोडले कोणी?
एकेक ओंजळीमागे
असतेच झऱ्याचे पाणी.

या सुप्रसिद्ध कवितेत थकलेले घर सावरणारी, घसरणारे आभाळ तोलणारी, पक्ष्यांच्या वस्तीचे झाडच तोडून टाकल्यावर झऱ्याचे ओंजळभर पाणी होणारी आईच आहे. म्हणून तर तिच्या मृत्यूनंतर कवी ‘घनव्याकूळ रडतो’, आपल्या गीताची ओळ आता अपुरीच राहिली म्हणून खंतावतो, तर तिच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून तिचीच विनवणी करतो. आणि पिंड शिवणाऱ्या, पर्यायाने आईला मुक्ती देणाऱ्या कावळ्याला ‘सांध्यपर्वातील

वैष्णवी’ अर्पण करून टाकतो.
‘आई’च्या जीवनशैलीतील विसंगती, विरोध, अगतिकता यांचे
भान कवीला एक मुलगा, एक जाणता पुरुष, एक नैतिक-
अनैतिकाच्या पल्याड गेलेला संन्यस्त, संवेदनशील कवी या अनेक नात्यांनी येत जाते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते येते.
‘अंधार येतो तिच्या भोवताली
तिला वाटते चंद्र ती मोजते
निनादातला मृत्यू यावा गळ्याशी
उभ्याने तशी अस्त ती झेलते.’
आयुष्यात उभ्या उभ्या स्वत:चे असे अनंत अस्त झेलणारी आई-
‘गर्भात हात हलतो भरली दुपार पोटी
आई उभ्या उभ्याने रचते अभंग कोटी’

जीवनाचे हे करुणरम्य कोटी कोटी अभंग रचताना, तिच्या आयुष्याचे चंद्रगंध विटून गेले, तरी ‘पाठीत वाकताना आई गळ्यात हसली.’ मुलांना उन्हाळेसुद्धा समना वाटून देणारी आई, तिला जगण्याच्या आरशातून (मृत्युरूप) घारी बोलावतात त्यांना आपला देहही वाटून देते. अशी ही ग्रेसच्या कवितेतली ‘आई’. ती बाई, ती पोर, ती वृद्धा, तीच सीता, ऊर्मिला, द्रौपदी. तीच मिसेस नॅली डीन, तीच मेरलीन मन्रो, तीच नटाली, तीच राधा पार्थसारथी, तीच हॉस्पिटलमधली केरळी नर्स, तीच चंद्रमाधवी, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांध्यभयाची सजणी! सर्व काही तीच. आदिम स्त्रीत्वरूप अशारीर स्त्री, हाडामांसाची शारीर स्त्री!

आई प्रतिमेचा अशा प्रकारे अनुभव घेणारी ग्रेसची संवेदनशीलता कधी रामायण-महाभारतातील सीता-मिथिला, (लक्ष्मण)- शूर्पणखा यांच्यासारख्या मिथकांतून दु:ख, वेदना, वंचना यांचे रूपही अनुभवते-
‘कधी हिडिंबा पारोशी
शूर्पणखाही उदास;
देहभावाला झोंबते
देहभावाची किळस!
कधी राधा कधी कुब्जा
देहाखालून चालते;
शूर्पणखेच्याही पोटी
नवे लक्ष्मणाचे नाते.

किंवा कृष्णाने भामा, द्रौपदी, राधा यांना दिलेल्या वेदनांचेही रूप कवी मातृप्रतिमेच्या पडछायेप्रमाणे अनुभवतो. मातृरूपातून घेतलेला हा स्त्रीत्वाचा शोध ग्रेसच्या कवितेतील धमनी आहे. अनुभवविश्वातील शक्तिकेंद्राचे स्थान गवसले आणि त्यांच्या संवेदनशीलतेचा धर्म उलगडला की, ग्रेसच्या ‘आई’ कविता दुबरेध राहत नाहीत. तसेच त्यांचा इतर प्रतिमांच्या संघाताशी अनुबंध जोडता येतो आणि ‘मातृरूप’ ‘स्त्री’ प्रतिमेतून प्राक्तन म्हणून मिळालेल्या निर्मितीशक्तीचा, निर्मितीऱ्हासाच्या भयाचा वेदनेचा उदास रंग समजू लागतो आणि कवी-

‘ही माझी प्रीत निराळी
संध्येचे श्यामल पाणी,
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी.’
असे का म्हणतो, यातला ‘डोह’ कोणता हे सहज उमगू लागते. कवितावाचनाच्या रूढ वाटा सोडल्यानंतरच ग्रेसच्या प्रतिमा समजल्यासारख्या वाटतात. एका कवितेतून एक सलग उलगडत जाणारे आशयसूत्र सापडले की कविता ‘समजली’ असे मानणारी वाट सोडली तरच ग्रेसच्या कवितेतील भाववृत्तींचे संरचित दिसू लागते.
कविता हा जर कवीची शब्दतंद्रा आणि रसिकाची शब्दतंद्रा यातील ‘भावविण्याचा करार’ असेल, तर ग्रेसची कविता हा करार पाळते असे म्हणता येईल. आणि मग कवीच्या अनुभवविश्वातील देहरूप, वासनारूप ‘मातृकेंद्र’ कवितेतून ‘शोकमग्न गीतांच्या ओळी’ लिहायला कसे उद्युक्त करते त्याचा थोडा थोडा तळ न्याहाळता येतो. म्हणूनच हे अर्थनिर्णयनाच्या तीरावरून दिसलेले ‘आई’चे रूप!

‘आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरज वेळी वाटत फिरतो
जोगी कुठले वेध?..
..त्याही नंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर..’

दिसले, समजले असे वाटावे आणि पुढच्याच प्रतिमेने आणखी तरंग उठवावेत आणि तरीही उत्कट, उदासीच्या लयीने ‘आई’ आपल्या मनाच्या नदीमध्ये नाद उमटवत निघून जावी, म्हणून हा अर्थनिर्णयनाचा तीर!

डॉ. ज्योतिका ओझरकर

प्रसिद्धी- चतुरंग, लोकसत्ता, शनिवार, ७ एप्रिल २०१२